माणूस पूर्ण हयातभर राबतो, मरमर मरतो, अगदी पोटाला पिळ बसेपर्यंत कष्ट करतो..का तर आपलं शेवट गोड व्हावं म्हणजे मृत्यू सुखात यावं... यां दुनियादारीत जगताना आणि जगातून जाताना कमीत कमी चार लोकांनी नाव घ्यावं... परंतु जर माणसाला हयातभर राबून, तारुण्यभर कष्ट करून आपल्या उतार वयात देखील राबावं लागत असेल तर....यां विचारानं काळजात गोळा येतो.. ज्या वयात दोन वेळ दोन घास खावं आणि आनंदाने मृत्यूची वाट बघावी त्या वयात जर का तरुणासारखं राबून घर चालवावं लागत असेल तर यापेक्षा अधिक वाईट ते काय असू शकतं.याला जबाबदार कोण म्हणायचं..... लहानपणी आपल्याला जीवनाचं तसेच सत्याचा आणि दुनियादारीची शिक्षा देणारें मायबाप, की भर तारुण्यात आपल्याला आयुष्यभरासाठी मृत्यू पर्यंत साथ देणारी भार्या की माझं भविष्य म्हणून गोंजारत, म्हातारपणाची काठी म्हणून पोसलेली पोरं.... की नशीब, भाग्य, दैव अश्या नानाविध नावाने ओळखलि जाणारे, रेश्मी किनाऱ्याचे गोड गोंडस हतबल करणारे आधार नसलेले निराधार असे शब्द... की वाईट काळ, वेळ, परिस्थिती वगैरे वगैरे म्हणतो अशी त्रोटक आधार वाटणाऱ्या शब्दाच्या कुबड्या..... तुम्हाला काय वाटतं बरं... *कोण जबाबदार असेल?....*
तुम्हाला वरील पैकी एखादा पर्याय वाटत असेल तर सावध व्हा... कारणं तुमचं निदान चुकणार आहे....
यां परिस्थितीला फक्त आणि फक्त तोच व्यक्ती जबाबदार असतो ... होय... तो स्वतःच.....ज्याच्यावर आज आपल्या उतारवयात कष्ट करून पोट भरण्याची वेळ आली आहे...आता तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे... तो तर हयातभर कष्ट करत आला आहे तरीपण त्याच्याच नशिबी हे कष्टप्रद जीवन यावं.... हे वाईट असूनही तुम्ही त्याच व्यक्तीला आरोपीच्या कठड्यात उभं करून टाकलं.... हे बरोबर नसून न पटणारं आहे....तुमचे विचार वरकर्णी पटणारे आणि सत्य भासणारे असले तरी परंतु त्यात जीवनाच्या सत्याला कुठेतरी बगल दिली आहे हे लक्ष्यात येत नाही... याचं कारणही तसंच गुप्त असल्यासारखं आहे.... कारण आजपर्यंत सामान्य जीवन जगत आलेल्या लोकांची हिच विचारश्रेणी राहिलेली आहे आणि याच सामान्य विचारांवर लोकं जगत आले आहे अजूनही जगत आहे आणि पुढेही काही असेच जगत राहतीलही....
याला जबाबदार आहे स्वतःचे सामान्य विचार, सामान्य कृती, स्वतःच्या स्वतः विकसित केलेल्या सामान्य क्षमता, याच सामान्य क्षमतेवरचं सामान्य जीवन.... कारण सामान्यपणे यात तो व्यक्ती जीवन जगण्यासाठी सामान्य मार्गाचा, सामान्य कृतीचा आणि सामान्य विचारांचा आणि सामान्य आचरणाचा उपयोग करत आला आहे, त्यामुळे त्याचं जीवनही सामान्य असेल त्यात फक्त कृतीवर भर दिलेला आहे.... उच्च तत्वाकडे संपूर्णतः दुर्लक्ष केलं आहे....
उच्च तत्वावर विचार करणारी व्यक्ती त्याचं कार्य आणि कृती देखील उच्च स्वीकारतात... अन उच्च तत्व स्वीकारलेली व्यक्ती ही फक्त एकचवेळा सामान्य कृती करून त्यातून मुक्त होतो... कारण तत्वावर चालण्यासाठीची पहिली पायरी ही सामान्य कृतीची आहे... परंतु शेवटची पायरी ही उच्च तत्व गाठून यशदायी, सुखी, किर्तीवंत करणारी आहे.... उच्च तत्वापर्यंत पोहचवून चिरकाल अमर करणारी आहे..
आता उच्च तत्व म्हणजे काय? तर अशी कृती ज्यामध्ये स्वतःच्या प्रगती सोबतच सर्वांच्या प्रगतीचं गमक असलेलं उच्चकोटीचे कार्य. ज्या कार्यामध्ये स्वतःला यातना होतील, दुःख भोगावे लागले तरी जगाच्या कल्याणासाठी त्या हसत सहन करून ज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण जगाला प्रकाशित करून सुखी करणे होय. वानगीदाखल सांगायचं झालं तर श्रीकृष्णाने धनंजय अर्जुनाला उद्देशून संपूर्ण जगाला कर्माला प्रथम स्थान देणारी गीता उपदेश केला,म. फुले अन माई सावित्रीबाई फुले यांनी स्वतःच्या अंगावर चिखल नि शेण झेलून स्त्रियाना सुशिक्षित बनवलं. एकूणच काय तर ज्यांना आपण मानतो तों जगतपीता ईश्वर, भगवान श्रीकृष्ण, राम, अल्लाह, येशू, पासून या उच्च तत्व धारण करणाऱ्या विभूतीचा यात समावेश होतो...पुढेही काळानुसार यामध्ये नाना विभूतीचा समावेश होतो ...जसे संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज ,स्वराज्य संस्थापक राजाधिराज शिवाजी महाराज, छत्रपती राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले, भारताचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधीजी,भगतसिंग, राजगरू, सुखदेव, वासुदेव बळवंत फडके, प. नेहरू, सरदार पटेल, बाबा आमटे, बाबा आढाव,हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक, पासून तर निराधारांना आधार देणारी अनाथाची माय शिंधुताई सपकाळ सारख्या अनेक विभूतीचा यात समावेश होतो. (टीप.मर्यादा पडत असल्यामुळे सर्व विभुतींचा उल्लेख करता येणे शक्य नाही )कालपरत्वे या उच्च विभूतींना देव म्हणून ओळखले गेले नंतर संत म्हणून आणि तदनंतर समाजसुधारक तर कधी नेते तर आता सामान्यातील सामान्य सुशिक्षित, ज्ञानी, दयावान लोकांचा यात समावेश करता येईल.
©✍ अनिल रायसिंग राठोड
आम्ही तिवरंगकर
9766843677